Saturday 4 November 2017

Rang de basanti

रंग दे बसंती राजकुमार संतोषी दिग्दर्शीत ‘दि लिजेंड ऑफ भगतसिंग’ ह्या चित्रपटाच्या सुरुवातीस एक प्रसंग आहे. महात्मा गांधी रेल्वेतून उतरत असतात आणि खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांना जाब विचारतो, कि ‘तुम्हाला शक्य असताना देखील तुम्ही भगतसिंग व त्याच्या सहकारयांची फाशी का थांबवू शकले नाही?” ह्यावर बापू खाली मान घालून निघून जातात, आणि चित्रपटगृहात बसलेल्या सर्व प्रेक्षकांप्रमाणे आपणही त्यांना तिरस्कारपूर्वक नजरेने हेटाळतो. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा इतर कोणत्याही क्रांतिकारकापेक्षा भगतसिंगच्या नावाचे गारुड ह्या पिढीवर फार आहे, इतके कि काही वर्षापूर्वी एकाच वेळी 5 जणांनी भगतसिंगच्या आयुष्यावर चित्रपटाची घोषणा केली। पुढे ‘रंग दे बसंती’ मध्ये भगतसिंग व त्याच्या साथीदारांचा जीवनपट दाखविण्यात आला होता! लहानपणी शेतात बंदुकाची रोपे लावणारा, जालियनवाला बागेच्या हत्याकांडाने हेलावणारा, सँडर्सवर गोळीबार करणारा, असेम्बलीत बॉम्ब फेकणारा, कारागृहात 55 दिवस उपोषणास बसणारा, आणि अखेर ‘जिस चोलेको पहन शिवाजी खेले अपनी जानसे’ असे गीत गात फासावर जाणारा भगतसिंग आपल्याला माहित आहे। पण हाच स्वाभिमानी भगतसिंग गांधींच्या याचनेमुळे सुटलेला एक क्रांतिकारक म्हणून आपण स्वीकारू शकलो असतो का?? स्वतः भगतसिंगाने आपल्या वडिलांना कळविले होते की माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असाल तर तसे करू नका. भगतसिगाला व त्याच्या साथीदारांना वीरमरण हवं होत. स्वतःला नास्तिक म्हणविणारा भगतसिंग कर्मयोगाचे आचरण करणारा होता. म्हणूनच सँडर्स प्रकरण ताजे असताना त्याने स्वतःहून असेम्बलीत बॉम्ब फेकण्याची जबाबदारी उचलली, कारण आपली बाजू जगभरात इंग्लिश मधून पोहोचवायची हि एक नामी संधी त्याला खटल्याच्या रूपाने मिळणार होती व ती जबाबदारी तोच सक्षमपणे पार पाडू शकणार होता. भगतसिंगच्या हौतात्म्यानेच त्याला अमर केले. ‘मरके निकलेगी न वतन कि उल्फत, मेरे मिट्टीसेभी खुशबू, ए वतन आएगी’ ह्या काव्यपंक्ती त्याने सार्थ करून दाखवल्या. आणि देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक कायमस्वरूपी आशावाद रुजवून गेला. म्हणूनच हि पिढी सुद्धा त्याच स्मरण करून म्हणते की “कोई देश परफेकट नही होता, उसे परफेकट बनाना पडता है, हम बनाएंग इसे परफेकट” सौरभ रत्नपारखी

No comments:

Post a Comment